शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

मुलाखत - उमेश कुलकर्णी



 वळू, विहीर सारखे चित्रपट निर्माण करून मराठी सिनेमाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे मराठीतले एक उभरते दिग्दर्शक, उमेश कुलकर्णी. त्यांची चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून घडणारे आत्मनिरीक्षण. या सगळ्याबद्दल, आमच्या मराठी मंडळाच्या हितगुज दिवाळी अंकासाठी, फोनवर त्यांच्याशी साधलेला संवाद.

दिग्दर्शक होण्याचा विचार सर्वात प्रथम कधी मनात आला?
शाळा कॉलेज मध्ये मला अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट होता. नाटक, कोरीयाग्राफी, आर्किटेक्चर, गणित यामध्ये काहीतरी करायचे होते. हे सगळे करत असताना, मराठीतले महत्वाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला त्यांच्या 'दोघी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बोलावले. त्या चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये मी शेवटपर्यंत इनव्हॉल्व होतो. त्यानंतर काही documentaries वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तो सगळा अनुभव खूप challenging वाटला. चित्रपट ही किती अवघड गोष्ट आहे आणि त्यात संगीत, कोरीयाग्राफी, भाषा या सगळ्यांच्या मिश्रणातून काहीतरी अद्भुत निर्माण होतंय असं वाटलं. त्यानंतर CA, LAW करायचे सोडून, सुखटणकरांनी सुचविल्याप्रमाणे मी FTII मध्ये अॅडमिशन घेतली. तिथे जगभरातले महत्वाचे दिग्दर्शक कळाले, त्यांच्या फिल्म्स पाहता आल्या, त्यांनी या माध्यमाचा कशा प्रकारे उपयोग करून घेतला या गोष्टी शिकता आल्या. काही स्वत:च्या गोष्टीही करता आल्या. त्यात असं लक्षात आलं की आपण जे करू पाहतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय. मग त्यानंतर आमची स्वतःची निर्मिती असलेला 'वळू' चित्रपट आम्ही निर्माण केला.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट मध्ये शिक्षण घेताना कोणत्या filmmakers चे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होते?
तशी खूप नावं घेता येतील. त्यातही सांगायचे झालेच तर आब्बास किरोस्तामी, फेडरिको फेलिनी, याशचीरो वोसी, भारतातले सत्यजित रे, रित्विक घटक, गुरुदत्त, केरळमधले अरविंदन यांच्या फिल्म्स पाहता आल्या आणि त्यांचा अभ्यास करता आला.

वळू चित्रपट कसा मिळाला? तो करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवताना कोणत्या अडचणी आल्या?
FTII मधून बाहेर आल्यानंतर काही documentaries वर काम करत होतो. ते करताना मी आणि माझा मित्र गिरीश कुलकर्णी यांनी ठरवले की आपली स्वत:ची फिल्म केली पाहिजे. FTII मध्ये 'गिरणी' नावाच्या माझ्या शोर्ट फिल्म ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हा वाटले की वळूसाठी आम्हाला सहज प्रोड्यूसर मिळेल. मग आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आणि वेगवेगळ्या निर्मात्यांकडे जायला लागलो. तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना जे चित्रपट आधी गाजलेले आहेत, त्याच पद्धतीचे चित्रपट बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आमच्या चित्रपटाचा नायक एक बैल होता, त्यामुळे लोकांच्या लक्षात येत नव्हते की ही कोणत्या प्रकारची फिल्म आहे. फिल्मचे बजेटही जास्त होते आणि आम्हाला कोणतीही compromise करायची नव्हती. तेव्हा दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर, आम्हाला हवी तशी फिल्म काढण्यासाठी आम्ही स्वत:च निर्माते व्हायचे ठरविले. मी, गिरीश, प्रशांत पेठे, गणपत कोठारी आणि नितीन वैद्य आम्ही सगळ्यांनी मिळून कर्ज काढून पैसे जमा केले आणि पहिली निर्मिती केली.


वळू चित्रपट दिग्दर्शित करतानाच्या काही आठवणी?
३० दिवस वळूचे शुटींग चालू होते. प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या अनुभवाचा होता. प्रत्येक दिवसाचं शुटींग म्हणजे एखादे लग्न manage करण्याएव्हढं काम होते. म्हणजे आम्ही ३० दिवसात, ३० लग्नं manage केली असे म्हटले तरी चालेल. सगळे कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, भारती आचरेकर, दिलीप प्रभावळकर, आमचा सिनेमॅटोग्राफर सुधीर पनसाळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही वळू पूर्ण करू शकलो.

वळू चित्रपट एवढा यशस्वी झाल्यानंतर विहिरची निर्मिती करणे सोपे गेले का? त्याला AB कॉर्प सारख्या कंपनीकडून साहाय्य कसे मिळवले?
त्याचा फायदा अर्थातच झाला. वळूनंतर खूप निर्मात्यांनी आम्हाला संपर्क केला. त्याचवेळी जया बच्चन यांचा पण एकदा फोन आला. त्यात वळूचे यश हा भाग होताच आणि त्याचबरोबर त्या माझ्या फिल्म इन्स्टीटयूट मधल्या सिनियर आहेत तिथली आमची ओळख होती. तिथे त्यांना माझी 'गिरणी' फिल्म आवडली होती, तेव्हा त्यांनी बरोबर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. विहिरची गोष्ट त्यांना आवडली आणि त्यांनी त्याची निर्मिती करण्यासाठी पैसे दिले.

विहीरला व्यावसायिक यश कितपत मिळाले?
पुण्यात आणि काही शहरांत तो रिलीज झाला. पुण्यात तो ३ महिने चालला होता. एखादा चित्रपट किती लोकांपर्यंत पोहचतो आणि किती खोलपर्यंत पोहचतो या दोन्ही गोष्टी माझ्यामते चित्रपटाचे यश सांगतात. अनेक तरुण मंडळीनी विहीर पाहून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, बर्लिन महोत्सवात ही तो दाखवला गेला. ३५ वर्षापूर्वी दाखविलेल्या 'सामना' या चित्रपटानंतर त्या महोत्सवात दाखविलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. त्याचबरोबर भारतातल्या आणि जगभरातल्या, अनेक मोठ्या चित्रपटमहोत्सवात देखील हा चित्रपट दाखविला गेला. कुठल्याही चित्रपटाचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग असतो तो विहिरला नक्कीच मिळाला.

देऊळ चित्रपटाबद्दल काही माहिती सांगाल का?
देऊळ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. तो या month end पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यावर आम्ही ३ वर्षे काम करतो आहे. आत्ता भारतातल्या खेड्यांमध्ये जी तरुण मुले आहेत, त्यांना शहरामधला जो झगमगाट आहे, तो TV आणि mobile मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचतो आहे. पण त्यासारखे आयुष्य जगण्याचे त्यांच्याजवळ resources नाहीत. त्याबद्दल आकर्षण तर आहे, पण ते मिळवण्यासाठी काही मार्ग नाही. खेड्यातच नव्हे तर शहरातही तुम्ही जगता त्यापेक्षा काहीतरी वेगळे जगण्याची फूस लावली जाते. तर अशी ही आजच्या जगण्याची गोष्ट आहे आणि ती अतिशय हलक्याफुलक्या ढंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात बरेचसे ज्येष्ठ कलाकार आहेत जसे की नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम आणि तो ४ नोव्हेंबर ला रिलीज होतोय.

फिचर फिल्म्स केल्यानंतर 'थ्री ऑफ अस', गारुड सारखे लघुचित्रपट करण्यापाठीमागे काय हेतू होता?
लघुचित्रपट हा चित्रपट सिनेमाचा एक वेगळा 'form' आहे आणि तो तितकाच सशक्त आणि challenging आहे. कमी कालावधीत एखादी गोष्ट मांडणे ही जास्त अवघड गोष्ट असते. अनेक गोष्टी अशा असतात की त्या जर छोट्या वेळामध्ये सांगितल्या तर जास्त प्रभावीपणे सांगता येतात. चित्रपट निर्मितीसाठी लोक जेव्हा पैसे देतात, तेव्हा ते पैसे त्यांना परत मिळवून द्यायची जबाबदारी तुमच्यावर येते. पण शोर्ट फिल्म्स मध्ये आर्थिक गणित नावाची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर जमलेली नसते म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे experiments करता येतात.

तुम्ही वळू, विहीर सारख्या चित्रपटांना कलात्मक की व्यावसायिक चित्रपट म्हणाल?
असे कुठल्याही पद्धतीचे tags आम्ही लावत नाही आणि दुसऱ्यांनीही ते लाऊ नयेत अशी आमची विनंती असते. कलात्मक किंवा व्यावसायिक असे काही नसते. आमच्या दृष्टीने फक्त एक चांगला चित्रपट बनविण्याचा आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.

कोणता चित्रपट दिग्दर्शित करायचं हे कसे ठरवता? कोणत्या प्रकारचे विषय आपणाला आकर्षित करतात?
काही वेळा असं होतं की एखादी कल्पना मनात येते आणि काही वर्षानंतर ती मनामध्ये आकार घ्यायला लागते. हे होत असताना आम्ही डोळसपणे अनेक लोकांना भेटत असतो, अनेक situations मधून जात असतो. काही गोष्टी खोलवर मनात रुजतात, त्याचं हळूहळू एखादं रूप तयार होतं. माझे मित्र गिरीश कुलकर्णी हे पटकथा आणि संवाद लिहतात. आम्हाला एखादी फिल्म करावीशी वाटली की आम्ही त्याच्याबद्दल बोलत राहतो. मग २-३ वर्षांनी त्याचं एक स्क्रिप्ट तयार होतं. अशी ती प्रोसेस आहे. आम्ही जाणूनबुजून एखाद्या विषयावर चित्रपट करायचे असे ठरवत नाही.

चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी आणि आता यशस्वी झाल्यानंतर आपल्या आयुष्यात काही फरक झाला आहे का?
मला स्वत:ला यश अपयश असे tags आवडत नाहीत. यश ही खूप फसवी गोष्ट आहे. आम्ही जे मांडू पाहतोय ते जास्तीत जास्त प्रभावीपणे कसे मांडता येईल. चित्रपट माध्यम वेगवेगळ्या पद्धतीने कसे explore करता येईल. आणि हे करत असताना माणूस म्हणूस स्वत:चा शोध कसा घेता येईल. हा आमचा मूळ उद्देश आहे. हे काम एका चित्रपटाने संपणारे नाही. तो प्रवास हाच आमचा आनंदाचा भाग आहे. त्याच्या शोधासाठीच आम्ही हे सगळं करतोय. त्यात यशाने खूप फरक पडत नाही. झालाच तर वळूसारखा चित्रपट जेव्हा चालतो, तेव्हा पुढच्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी मदत होते इतकाच.

आपल्या भविष्यातील प्रोजेक्ट्स बद्दल काही माहिती सांगाल का?
आम्ही एका नवीन चित्रपटाची निर्मिती करतो आहोत, ज्याचं नाव 'मसाला' असं आहे. त्याचे आम्ही creative producer आहोत. गिरीश कुलकर्णीनी तो चित्रपट लिहिला आहे आणि संदेश कुलकर्णी तो दिग्दर्शित करणार आहेत.















सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

मृगजळ

      लाल रंगाची मारुती रस्त्यावरून चालली होती. संध्याकाळची वेळ होती. आजीच्या बाजूची खिडकी उघडी होती. बाहेरच्या थंडगार वाऱ्याबरोबर संधिप्रकाशाची रुपेरी किरणं, तिच्या रुपेरी केसांशी खेळत होती. एखाद्या लहान मुलीसारखी ती खिडकीवर हात ठेऊन बाहेर टकमक बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचा बालिश आनंद न्याहाळत, शेजारी तिची नात स्नेहा बसली होती.
"हे तुझ्या आजीचं माहेर." स्नेहाच्या आईने स्नेहाची तंद्री भंग केली. गाडी एका गावावरून चालली होती.
"You mean my great grandmother's" झोपण्यासाठी मिटलेले डोळे उघडून स्नेहाची सात वर्षांची मुलगी, आस्था उद्गारली. तिला बहुतेक आजीचं मराठी कळलं हे दर्शवायचं असावं. गाडीत पाठीमागे चौघीही दाटीवाटी करून बसल्या होत्या. आस्थाला तिच्या आजीने मांडीवर घेतले होते आणि स्नेहा तिच्या आजीजवळ बसली होती. त्या घरातल्या चार पिढ्या त्या गाडीत पाठीमागच्या सीटवर सामावल्या होत्या.
       आज सकाळी जेव्हा आजीला पाहायला म्हणून स्नेहा निघाली, तेव्हा तिला घेऊनच ती परतेल याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. मागच्या दोन्ही भारत भेटीत तिला आजीकडे जायला मिळालं नव्हतं. त्यामुळे या वेळी जायला एक आठवडाच राहिला असताना, वेळात वेळ काढून ती चालली होती. जाताना तिच्या डोळ्यासमोर गोरीपान, उंच, भलंमोठ्ठं कुंकू लावलेली आजीची मूर्ती होती. तशी सगळ्यांनी तिला कल्पना देऊन ठेवली होती पण प्रत्यक्षात आजीला पाहिल्यावर तिला रडू फुटलं. अंधार्या खोलीतून छोटीशी, अशक्त, सुरुकुतलेल्या शरीराची आजी बाहेर आली आणि मध्ये किती काळ गेला असेल याची स्नेहाला जाणीव झाली. तसा पाच-सहा वर्षांचा काळ खूप नव्हता. पण त्या कालावधीत झालेल्या घटनांनी आजीच्या तब्येतीवर चांगलाच टोल घेतला होता. आपल्याला कोण भेटायला आलं म्हणून आजीनं तिच्याकडे कुतूहलानं पाहिलं. सगळ्यांना वाटलं की ती कदाचित स्नेहाला ओळखेल. पहिली नात म्हणून स्नेहा सगळ्यांचीच खूप लाडकी होती. पण एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहावं तसं आजीनं तिच्याकडे पाहिलं. तिचं कृश शरीर मिठीत घेताना स्नेहाला असंख्य यातना झाल्या. हीच आजी: आपली काळजी करणारी, पोट भरले तरी प्रेमाने खाऊ घालणारी, रस्त्यात वेडंवाकडं पळाल्यावर धोपटणारी, शनिवारी कोणतेही महत्वाचे काम न करणारी, आपल्याला मारलं की आईला तंबी देणारी! तिच्या कितीतरी आठवणी स्नेहाच्या मनात दाटून आल्या.
            मग तिनं आजीशी एकतर्फी खूप गोष्टी गेल्या. लहान मुलाच्या उत्सुक नजरेनं आजीनं त्या सगळ्या ऐकल्या. पण निघायची वेळ झाली आणि तिला सोडून जाणे स्नेहाच्या जीवावर आलं. आता पुन्हा आजी भेटेल का या विचारानं तिला कसनुसं झालं. "आई, प्लीज तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊया ना?" तिनं आईला विनंती केली. तिची आईही सर्व्हिस करणारी. घरी नेऊन आजीचे हाल होतील ही तिला काळजी. तिच्यासाठी दिवसभर घरी कोण थांबणार? इथं at least मामी असते तिची काळजी घेणारी. पण शेवटी स्नेहानं तिला तयार केलंच. आजी केवढी खुश झाली! लहानपणी एस. टी. त बसून जायचं म्हटल्यावर स्नेहाला जेवढी मजा वाटायची अगदी तसेच भाव आजीच्या चेहऱ्यावरही होते.
            आजीचे केस तिच्या खूपच डोळ्यावर येत आहेत हे पाहून स्नेहाने ते पुढे होऊन मागे सारले. आजीने तिच्याकडे आस्थेनं बघितलं आणि पुन्हा बाहेर नजर वळवली. बाहेर तिला कसलीतरी खुण पटल्यासारखी झाली. गाडी तिच्या शाळेजवळून चालली होती. आज दुपारीच तर तिने रामुशी भांडणे केली होती. आणि चिडून जाऊन रामूनं, रस्त्यावरचा दगड फेकून तिच्या डोक्यात मारला होता. भळाभळा रक्त वाहायला लागलं होतं म्हणून शिक्षकांनी तिला, तिच्या मोठ्या बहिणीबरोबर घरी पाठवले होते. वडील शेतातून घरी येण्याआधी ती घाबरून कोपऱ्यात बसली होती. बाबांना कळलं तर मार मिळणार याची तिला खात्री होती.
"मी नाही रामूची खोडी काढली. त्यानंच माझा खोडरबर चोरला होता." अचानक स्नेहाकडे पाहत ती म्हणाली. आजीला एकदम काय झाले हे स्नेहाला कळेना. तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून तिला एकदम भडभडून आलं.
"कोण रामू आजी? काय केलं त्यानं?" आजीला जवळ घेत तिनं विचारलं.
"त्यानं माझ्या डोक्याला मारलं." डोक्याकडे हात नेऊन आजीने तक्रार केली.
"हो हो. तो रामू आहेच तसा खोडकर"
"तू बाबांना सांगणार नाही ना?”
"अ हं. बिलकुल नाही" आजीच्या कृश हातांचा विळखा तिच्या गळ्याभोवती पडला. डोळ्यातलं पाणी तिने आजीच्याच साडीला पुसले. लगेचच लहान मुलीसारखं समाधानानं हसत आजीने तिच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली.
          लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी आजोबा तर कधी आजी त्यांना आजोळी घेऊन जायला येत असत. तेव्हा ती आजीच्या खांद्यावर मान टाकून अशीच झोपली असेल गाडीत! आई बाबा रागवले की आजीच्या कुशीत जाऊन लपायची तिला सवय. त्या कुशीतली ती मायेची ऊब, अगदी मागच्या भेटी पर्यंतही तशीच होती. तिच्या काळजीने वेडी होणारी आजी तिला आठवली. एकदा चुकून तिच्याकडून, बोगद्यातल्या सापाला दगड लागला, असं तिच्या घोळक्यातलं कुणीतरी म्हणालं, म्हणून आजीने किती अकांडतांडव केला होता. तिथं खरंच साप होता की नव्हता हेही तिने पाहिलं नव्हतं. पण त्याची माफी मागायला सांगून आणि तोंडाने 'आस्तिक मुनीची शपथ' असा सतत जप करायला लाऊन तिने तिला पूर्ण घाबरवून टाकलं होतं. तो संपूर्ण उन्हाळा, कुठेतरी तो साप दगा धरून बसलाय या धास्तीत स्नेहाने घरात बसून काढला. अजूनही तिच्या मनातली ती सापाची भीती गेली नव्हती. आजीची कृपा!
         तिने आजीकडे पाहिलं. शांतपणे ती तिच्या खांद्यावर विसावली होती. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तिचं भलं मोठ्ठं गोंदण उठून दिसत होतं. तोंडात मोजकेच दात बाकी होते, त्यामुळे गाल खोबणीत गेले होते. तिचा कृश, जाळ्या जाळ्यांचा हात तिने हातात घेतला. नवव्या वर्षी लग्न करून आजी घरात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सत्तर वर्षात आजीनं काय काय पाहिलं असेल, सोसलं असेल? तिच्या मनात आलं. आणि आत्ता त्याची तिला कसलीच आठवण नव्हती. एक आख्खं आयुष्य, त्याच्यामध्ये घडलेल्या असंख्य घटना, संवाद, हजारो माणसे सगळं आता तिच्या दृष्टीने शून्यवत होतं.
"आई, कसं गं हे आजीचं झालं? तिला काहीच समजत नाही का?" न राहवून तिने आईला विचारलं.
"गप रडू नको. म्हातारपणी असं व्हायचंच."
"असलं काही पाहिलं की जगण्यात काही अर्थच वाटत नाही."
"असलं काही बोलू नये. चांगला नवरा आहे, दोन मुलं आहेत. चांगला संसार करायचा." आई कशीतरी तिची समजूत काढत होती.
"मलाही नवरा आहे." त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या आजीनं, अचानक स्नेहाच्या खांद्यावरची मान उचलून सांगितलं.
"हो का?" तिच्या आकस्मित बोलण्यावर स्नेहाला काय म्हणावे ते सुचेना.
"हो. ते कराडला असतात. शाळेवर शिक्षक आहेत. मला दर महिन्याला पैसे पाठवून देतात."
कुतूहलानं स्नेहाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत ती म्हणाली. स्नेहाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसतोय की नाही याचा ती अंदाज घेत होती. ऐंशीतली तिची आजी! तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या, निस्तेज डोळ्यामधली ती आर्जव स्नेहाचं काळीज चिरून गेली.
"हो? किती पैसे पाठवतात?" आवंढा गिळून तिने विचारलं.
आजीच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले. खूप वेळ तिने विचार केला.
"शंभर." शेवटी ती उत्तरली.
              पहिला मुलगा झाल्यानंतर एक दोन वर्षांसाठी आजोबा कराडला सर्व्हिसला जात होते हे स्नेहाला माहित होते. पण आजी त्याबद्दल बोलत होती की आता दर महिन्याला आजोबांची पेन्शन तिला मिळत असे त्याबद्दल हे स्नेहाला कळलं नाही. लग्न झाल्यावर सुरुवातीला आजोबा म्हणे आजीला खांद्यावर घेऊन फिरवत असत. हे खरं की खोटं कुणास ठाऊक. नऊ वर्षांचीच होती ती! माहेरी आजी अतिशय लाडात वाढलेली. घरी दोघी बहिणीच, त्यांना भाऊ नव्हता. घरचीच गाईगुरे त्यामुळे दुधदुभतं भरपूर. वडिलांनी कधी कसला लाड पुरवला नाही असं झालं नाही. पण सासरी ती एकत्र कुटुंबात येऊन पडली. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला. दिराने एकदा तिच्यावर हातही उगारला होता, तेव्हा ती सहा महिने माहेरी जाऊन राहिली होती. पण आजोबा शेवटपर्यंत कसे तिला न्यायला आले नाहीत ही गोष्ट पोटतिडकीने तिने आत्तापर्यंत सगळ्या नातवंडाना सांगितली होती. पण नंतर आपोआपच तिला घराची ओढ वाटू लागली आणि तिच्या वडिलांनी तिला घरी आणून सोडले. नंतर सासू-सासरे, दीर, नणंद यांच्या मर्जीनुसार वागायची सवय जडली. लहान वयातच मुले व्हायला सुरुवात झाली. सगळं तरुणपण मुलांना जन्म देण्यात आणि त्यांच दुखणंखुपणं काढण्यात गेलं. मुलांच्या शिक्षणासाठी दागिने मोडून लंकेची पार्वती झाली. नंतर तीच मुलं मोठी होऊन सुना घेऊन आली. पण सासूपण भोगायचे सोडून, शिकल्यासवरलेल्या सुनांकडून तिला ऐकून घ्यायची पाळी आली. सुना आल्यानंतर, आता सुखाचे चार घास मिळतील असं तिला वाटलं असेल का? या आयुष्याच्या रहाटगाडग्यातून कधी तिची सुटका झाली असेल का? स्नेहाच्या मनात विचार येऊ लागले.
आस्थाने थोडी चुळबूळ केली.
"ही तुझी मुलगी का?" तिच्याकडे पाहत आजीने विचारलं.
"हो"
"मलाही एक मुलगी आहे.”
"हो? काय नाव तिचं?" स्नेहानं विचारलं.
“मीना." स्नेहानं चमकून आईकडे पाहिलं. स्नेहाच्या आईचंच नाव मीना होतं. आई, आस्था बरोबर शांतपणे झोपली होती. स्वतःचे नाव आजीच्या तोंडून ऐकून आईला बरं वाटलं असतं! पण आजीला मीना तिच्याबरोबर गाडीत आहे याची काही जाणीव नव्हती. तिच्या मनातली मीना केवढी असेल असं स्नेहाला वाटलं.
"मग कुठाय मीना आता?" तिनं विचारलं.
"ती शाळेत जाते. शंकराच्या देवळाजवळ ती शाळा आहे ना, तिथं जाते ती." पापणीही न हलवता आजीने सांगितलं.
"किती मुलं आहेत तुला?" स्नेहाला उगाचच कुतूहल वाटलं.
"तीन."
         आजीला एकूण आठ मुलं झालेली. त्यातली तीन बाळपणातच वारलेली. पण आत्ता तिला त्यातली फक्त तीनच आठवत होती. अधून मधून स्नेहा तिच्या तोंडावरून हात फिरवत होती. आस्थाच्या तोंडावरून फिरवावा तसा! आपल्यावर एवढं प्रेम करणारं अचानक कोण आलंय म्हणून आजी तिच्याकडे कुतूहलाने बघत होती. सुखावत होती.
"माझा एक मुलगा साताऱ्यात दुकान चालवतो." आता ती बबन मामाबद्दल बोलत होती. तीन वर्षापूर्वी स्नेहाचे आजोबा वृद्धत्वाने गेले आणि त्यानंतर दोनच महिन्यात accident मध्ये बबन मामाचा देहांत झाला होता. त्या धक्क्यानंच आजीची ही अवस्था झाली होती. तिला वर्तमान, भूत, भविष्य काळाची कसली जाणीवच राहिली नव्हती. टाईम मशीन मध्ये बसल्यासारखं आजीचं मन वेगवेगळ्या कालखंडात वावरत होतं. तिच्या आयुष्यातल्या घटना एखाद्या मृगजळा सारख्या तिच्या मेंदूत हुलकावण्या देत होत्या. आजीची बुद्धी गेलीय असं सगळे म्हणत होते. पण स्नेहाला माहीत होतं. अल्झायमर या रोगाबद्दल अमेरिकेत तिनं कितीतरी ऐकलं होतं. पण तो कुणाला झालेला ती प्रथमच पाहत होती. त्याच्याबद्दल अमेरिकेत किती जागृती निर्माण केलीय! पण इथे भारतात म्हातारपणी असं व्हायचं असं लोक गृहीतच धरतात. हात नसला, दृष्टी नसली तरी जगणं ती समजू शकत होती. पण स्मरणशक्तीच नसेल तर! तिने आस्थाकडे पाहिलं. ती आहे, आई आहे, नवरा आहे म्हणून तिच्या जगण्याला अर्थ आहे. त्यांचं अस्तित्व हीच तिची ओळख आहे. कुणी विचारलं तू कोण आहेस म्हणून तर आस्थाची आई, आईची मुलगी आणि नवऱ्याची बायको म्हणूनच तिनं स्वत:ची ओळख करून दिली असती. पण ती त्यांनाच विसरली तर? मागच्या सगळ्या आठवणीच विसरली तर? किती पोकळी जाणवेल तिच्या मनात? सगळेच परके! पण सगळे परके आहेत हे कळायला आधी स्वत:ची ओळखही राहायला हवी ना? कसं वाटत असेल आता आजीला? तिच्या मनात काय विचार चालले असतील?
         घरी पोहचल्यानंतर शून्यमनस्कपणे आजीला तिने घरात आणले. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन आजीसाठी तिने दोन-तीन चांगल्या साड्या घेतल्या. घरी आल्यावर लगेचच आजीला तिने एक साडी नेसायला लावली. आजीचा चेहरा खुलला. किती वर्षांनी तिला नवीन साडी मिळाली असेल देव जाणे! आजीची आठवण म्हणून तिनं सगळ्या फॅमिलीचा एक फोटो घ्यायचं ठरवलं. तिला मध्यभागी बसवून सगळे तिच्याभोवती उभे राहिले. त्या फोटोतही आजीने तिचा हात पकडला होता. नंतर डिजिटल कॅमेऱ्यात तो फोटो पाहताना तिला कसंतरीच झालं. आजी कॅमेऱ्या कडे बघत नव्हती. कुठेतरी शून्यात, पैलतीरी तिची नजर लागली होती. जणू तिला या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं. स्नेहाला स्वत:चाच राग आला. तिला वाटलं की हे सगळं ती स्वत:साठीच करतेय. काय करायचा आहे तो फोटो आजीला? फोटोतली ती क्षीण, अशक्त आजी! आजीची असली आठवण हवीय तिला? पण तो फोटो डिलीट करायचं धाडस तिला झालं नाही.
          त्यानंतरचे चार दिवस खूप घाईत गेले. अमेरिकेला जाण्या आधीची शॉपिंग, मित्र-मैत्रिणींना भेटणं यात आजीसाठी तिला मनासारखा वेळ देता नाही आला. तरीही तिची तिने बरीच सेवा केली. आजीही लहान मुलासारखी तिलाच चिकटून असे. तिच्याकडूनच जेवण घेई. आता आजीनं तिला मीना म्हणायला सुरुवात केली होती. घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दिवसभर जेव्हा स्नेहा बाहेर असे, तेव्हा आजी सगळ्यांना, माझी मुलगी मीना मला हे आणणार आहे, इथे घेऊन जाणार आहे, ती माझ्यासाठी ते करेल, अशा गोष्टी करत असे. घरातल्या सगळ्यांनी स्नेहाची टिंगल करायला सुरुवात केली होती.
           शेवटी ती वेळ आली. ती गेल्यानंतर आजीचं काय होणार याची तिला काळजी वाटू लागली. तिला ते नक्की परत पाठवतील. तिथे तिचा लाड कोण करेल? तिची लहान मुलासारखी एवढी काळजी कोण करेल? आजीला तिचा चांगलाच लळा लागला होता. ऐअर पोर्टवर नेणारी गाडी दारात आली. सगळेजण तिला सोडायला बाहेर आले. तिनं आजीला घट्ट मिठी मारली. ही कदाचित शेवटचीच! तिने आजीला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितली. त्याचं नंतर तिलाच हसू आलं. आजीला काहीतरी चांगलं होत नाही याची चाहूल लागली होती. घाबरलेल्या सशासारखी ती तिच्याकडे पाहू लागली. स्नेहाने तिच्या तोंडावरून हात फिरवला. तो स्पर्श एखाद्या पाडसाला करावा तसा! आणि ती आजीची नजर विस्मयाची, आदराची, उपकाराची! आयुष्यभर सगळ्यांना भरभरून देऊन, आता रिकामी झालेली आजी; याचकाच्या नजरेनं तिच्याकडे बघत होती.
           ती अमेरिकेत पोहचल्यानंतर तिला कळलं की ती गेल्यानंतर आजी घरात आत यायलाच तयार नव्हती. माझी मुलगी मीना मला न्यायला येणार आहे असं म्हणत ती बाहेरच बसून होती बराच वेळ. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी तिला तिच्या घरी पाठवून दिलं होतं. तिथे ती घरभर फिरत तिला शोधत असेल का? का लगेच विसरली असेल, बाकी सगळं विसरली तसं? स्नेहाला हुंदका फुटला. “आजी, आयुष्यभर मृगजळाच्या मागे लागून तुझ्या हाती काहीच लागलं नाही. आता माझी पाळी.” स्वत:शीच ती म्हणाली.

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

मनातलं द्वंद्व

उदास सैरभैर मनाला सावरायला, गवतात जरा जाऊन बसले.
कशा प्रकारची माणसं भेटतात, त्याचा विचार करत राहिले. ||
समोर छोटंसं तळ होतं, कानात गुलजारचं गाणं होतं.
मनात द्वन्द्व सुरु होतं, खूप चांगलं असणं काही बरं नव्हतं. ||
मागून इवलेशे दोन कान झाडीतून डोकावत होते.
माझी शांती भंगू नये म्हणून शांतपणे ऐकत होते. ||
त्यांच्या सारखे सगळेच लोक असते तर?
नको तिथे हक्काने लुडबुडणारे नसते तर? ||
काहीना सवय असते, धांदात खोटं बोलायची
काही काम न करता, खूप काही दाखवायची. ||
काहीमध्ये कौशल्य असते, काम करून घेण्याचं.
गोड बोलून दुसऱ्यांना मनासारखं वागायला लावायचं. ||
काही लोक नुसतेच पाहतात, किनाऱ्यावरून अंदाज घेतात.
योग्य वेळ येताच, आपलं सगळं साधवून घेतात. ||
आणि काही माझ्यासारखे, काम करून निव्वळ मरतात.
आणि नंतर त्याच्या श्रेयासाठी खुळचट भांडत बसतात. ||
विश्वास कुणावर ठेवावा, याचाच डोक्यात गोंधळ उडतो.
आपलं आपलं ज्याला म्हणावं, त्यांच्याकडूनच भ्रमनिरास होतो. ||
खरंच! खोटं न बोलणं एवढं अवघड आहे का?
परिस्थितीचा फायदा न घेता जगणं अगदीच अशक्य आहे का? ||
तूच सांग मला त्या लपलेल्या हरिणा?
काय बरोबर आणि काय चुकीचं?
माझं सरळ वागणं की त्यांचं समजून अज्ञान पांघरणं? ||

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

भ्रष्टाचार

          लहानपणीची एक गोष्ट आठवली. उन्हाळ्याच्या सुट्टीत, झोपण्याआधी माझ्या आजोबांना, आम्ही  ७-८ नातवंडे गोष्टीसाठी आग्रह धरत असू. नेहमी ते चांगली गोष्ट सांगत. पण कधी त्यांना कंटाळा आला असेल तेव्हा त्यांची गोष्ट अशी चालू होत असे.
"एकऽऽऽ होता राजा. काय होता?"
"राजाऽऽऽ" आम्ही पिलावळ ओरडत असू.
"मगऽऽऽऽऽ एक होता?"
"राजाऽऽऽ"
"आणि ऽऽऽऽऽऽऽ एक होता राजा"
मग आम्ही नातवंडे चिडत असू. पण ती गोष्ट कधीच संपत नसे. फिरून फिरून ती  पून्हा "एक होता राजा" वरच येत असे. 'अण्णा हजारे ऑगस्ट मध्ये पून्हा उपोषण सुरु करणार' ही बातमी वाचून मला ही गोष्ट आठवली. या भ्रष्टाचाराचंही तसंच नाही का? तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक? कसाही असला तरी  भ्रष्टाचार जगाला नवीन नाही. लालच हा मनुष्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आदिमानवाने ही कशाच्यातरी स्वरूपात, कुणालातरी लाच दिलीच असेल.
          जगभरात आपल्याला त्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. अमेरिकेत Watergate scandal पायी प्रेसिडेंट Nixon ना राजीनामा द्यावा लागला होता. बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींचे नाव गुंतले गेले होते. सुरेश कलमाडींना Commonwealth Games च्या अफरातफरीमध्ये जेल मध्ये सुद्धा टाकलंय. अफगाणिस्तान मधले सरकार तर एवढं भ्रष्ट आहे की त्याची वर्तमानपत्रात दररोज नवीन बातमी असते. Rupert Murdoch सारख्या powerful माणसाच्या अनेक कंपन्यांनी, त्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने, अगदी  ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून रॉयल कुटुंबालाही  धाकात ठेवले होते. याच ब्रिटिशांनी, तेव्हाच्या भारतातल्या छोट्या मोठ्या राजांना लालच दाखवूनच भारतावर कब्जा केला होता. आज आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय पण भ्रष्टाचारापासून कुठे मिळालंय? उलट स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार वाढतच चाललाय! 
           जन लोकपाल विधेयकामुळे IAC (India Against Corruption) च्या नेत्यांना, भ्रष्टाचारासाठी कुणावरही, अगदी पंतप्रधानांवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. गेले ४२ वर्षे त्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली नाही, याचा अर्थ इतकी वर्षे आपल्याकडे राज्यसभेत निम्म्यापेक्षा जास्त नेते भ्रष्ट आहेत असा आपण घ्यायचा का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
           बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनसाठी domicile certificate घेताना किती नाकीनऊ येते हे आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म, मृत्यूचा दाखला घेतानाही तुम्हाला लाच द्यावी लागते. या भ्रष्टाचारामुळे कितीतरी NRI लोकांना भारतात परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध बंड करण्याची हीच वेळ योग्य नाही का? जेव्हा जगभर सोशल मेडिया द्वारे अन्यायाविरुद्ध उठाव होत आहेत, ज्याच्यामुळे तरुण वर्गाला पटकन त्यांचे मत मांडण्यास, संघटना स्थापन करण्यास वाव मिळत आहे. त्या औद्योगिक क्रांती (Technological Revolution) च्या युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंनी पूर्वीही उपोषणे केली होती, पण एप्रिल मधल्या त्यांच्या उपोषणाला, जसा संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला होता तसा पूर्वी नव्हता मिळाला. Facebook मुळे निमिषार्धात हजारो लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.
          एवढं सगळं झालं तरी, जन लोकपाल विधेयक भक्कम करण्याकरता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जमलेले समाजसेवक आणि सरकार यांच्यामध्ये जूनमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली नाही. तेव्हा अण्णा हजारेंनी ऑगष्ट मध्ये पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. बघूया त्याचे काय होते ते? भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होणार्‍या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे? कदाचित शिक्षेपेक्षा, भर समाजात झालेल्या त्या अपमानाने लोकांवर थोडा वाचक बसेल!
          थोडक्यात लाच देणे घेणे ही सहज सोपी गोष्ट नसून तो एक गुन्हा आहे; हेच सामान्य माणसाच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या दुर्दैवाने, गणपतीने जसा, पृथ्वीला फेरा घालण्याऐवजी, स्वतःच्या आईवडीलांना फेरा घालून पैज जिंकली होती, तसा काही शोर्टकट आपल्याजवळ नाही. पण अण्णांची लढाई अगदी गणपती येण्याच्या तोंडावर सुरु होतेय, तेव्हा बघूया विघ्नहर्ता गणपती काही मदत करतोय का?
          पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यावर पोलिसाने पकडल्यावर १०० रुपयात काम नाही झाले म्हणून तुम्हीच तक्रार करू नका म्हणजे झाले!

बुधवार, ३० मार्च, २०११

पप्पांचे मोर!

मोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात
मी अत्यानंदाने ओरडले
'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर!' तुम्ही म्हणालात.
मग मोरांच्या झुंडी कशा आल्या,
आणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:
याच वर्णन तुम्ही केलंत.
'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.
हे कितीतरी दिवस चाललं
पण तो उद्या कधीच नाही उजाडला...
आणि आता तुम्हीच नाही राहिलात
मोर पाहायला घेऊन जायला.

त्यावेळी जर मी आले असते तर!
तुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर!
त्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख
माझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले
आता ते मोर मला पाहायचेच होते,
तो रस्ता मला तुडवायचाच होता.
ज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले
त्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.
मग आम्ही निघालो.
संध्याकाळच्या सहा वाजता.
कुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.
सगळा ओढा पालथा घातला.
तुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.
मग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला
आणि आम्ही पळालो
काट्याकुट्यातून, चिखलातून.
सगळे बेभान होऊन.
मोर मोर..पप्पांचे मोर!
शरीरातला कण न कण गात होता.
वरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.
सारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.
आणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.
तुमच्यासारखाच!
खूप रडू आलं.
मोर न पाहता जायचं जीवावर आलं.
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत
हे नुकतंच कुठं शिकलो होतो.
रडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.
आणि त्याच वेळी आमच्या समोरून
डौलात एक मोर आणि मोरणी येत होती.
पप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती?
पुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,
त्या मोरांना बघायला जायचं,
कधीच चुकवणार नाही मी आता.

गुरुवार, १० मार्च, २०११

फेसबुक

           गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!
           अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
           तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
          तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
              समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
          वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

The Good and The Great!

            परवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - "तुझे काय चाललेय? इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय." त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्‍यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता! एवढ कौतुक! असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा! मी विचारात पडले.
                दीडशे वर्षे गोर्‍या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही? गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे! क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्‍या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल! पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. "अतिथी देवो भव" ची आपली संस्कृती! आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्‍या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज! दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा! आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्‍या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव! आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे?
                      मग आपण त्यांच्यासाठी काय करावे? पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्‍या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस! क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.
                      पण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्‍याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का? बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का? मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही!'